अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया सुरू, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान होनार जमा ; खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी राज्य शासनामार्फत मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत पात्र शेतकऱ्यांमध्ये अनुदानाचे वितरण सुरू झाले, परंतु अनेक खातेदार अजूनही मदतीपासून वंचित आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी (Farmer ID) पेंडिंग असणे, काही खातेदारांचा मृत्यू झालेला असणे किंवा सामायिक खातेदारकांचे अनुदान वितरण प्रलंबित असणे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ स्तरावर एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात जिल्हाधिकारी कार्यालयांना अनुदानाचे वाटप तातडीने पूर्ण करण्याचे आणि लाभार्थी तसेच केवायसी (KYC) प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या निर्देशानंतर काही दिवसांनी प्रक्रिया सुरू झाली, मात्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्याने कर्मचाऱ्यांची व्यस्तता वाढली आणि अनुदानाच्या वितरणाला पुन्हा खीळ बसली. यामुळे केवायसी केलेले शेतकरी देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. तथापि, आता प्रशासनाने ही मोहीम पुन्हा सक्रिय केली आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानाच्या वितरणासाठी आचारसंहितेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे, प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. खासदारामार्फत हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित होण्यापूर्वीच घाईगडबडीने वितरण प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, ३ डिसेंबर २०२५ पासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, जी ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. अहिल्यानगर (८५,०००), सोलापूर (८५,०००), बीड (६३,०००) यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी केवायसीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांची केवायसी राहिली आहे, त्यांना लवकरात लवकर तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून ती पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. साधारणपणे, ५ डिसेंबर २०२५ पासून केवायसी पूर्ण झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे.